महावतार नरसिम्हा चित्रपट – आत्मसाक्षात्काराची अनुभूती

आजकाल गर्दीने भरलेले थिएटर आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी थिएटरच्या सर्वात पुढच्या रांगेत देखील लोक उत्सुकतेने गर्दी करत असल्याचे पाहणे दुर्मिळ आहे. पण महावतार नरसिंहाच्या बाबतीत नेमके हेच घडले. अशी उत्सुकता निर्माण करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट, स्वतःबद्दल बरेच काही सांगून जातो.

भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराची कथा तर लहानपणापासून ऐकत आलोय; मनावर कोरली गेली आहे त्यामुळे अगदी तोंडपाठ आहे ती. त्यामुळे त्या कथेवर जर चित्रपट बनत असेल तर त्यामध्ये काय एवढे विशेष असणार होतं, नाही का? आणि तेही एनिमेटेड चित्रपट म्हणजे एखादी लहान मुलांसाठी बनवलेली कार्टून फिल्म. त्यातही प्रत्येक भूमिकेसाठी चित्रविचित्र आवाजांचा वापर. विशेषतः खलनायकाला एखाद्या गल्लीतल्या गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीचा असावा तसा आवाज. कारण तीच तर हिंदी चित्रपटांची ख्याती आहे.

पण महावतार नरसिंहाने त्या पूर्वकल्पित कल्पना पूर्णपणे मोडून काढल्या.
पहिल्या फ्रेमपासूनच चित्रपट तुम्हाला आकर्षित करतो. वेग, रचना आणि भावनिक लय आकर्षक आहे. अ‍ॅनिमेटेड असतानाही हा चित्रपट सुरुवातीपासून पकड घेतो ते त्याच्या कथेतील मांडणीमुळे आणि कुठेही रेंगाळत न राहता गतिमान राहिल्यामुळे. मला सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे कथानक आणि व्हीएफएक्सचे जबरदस्त मिश्रण त्यामुळे अ‍ॅनिमेटेड असूनही, पात्रे खोलवर वास्तविक वाटू लागतात. त्यांचे भाव, त्यांची ऊर्जा यांचा योग्य ठिकाणी व कथेला अनुसरून वापर खरंच खूप मोठा प्रभाव आपल्यावर टाकतात आणि नकळत आपण त्यात गुंतून जातो.

लहानपणी पौराणिक चित्रपट पाहताना त्यात अध्यात्म आणि देवाच्या एखाद्या अवताराने असुरांचा आणि वाईट प्रवृत्तींचा केलेला संहार असायचा आणि लोकं तेवढ्याच भक्तिभावाने ते चित्रपट पहायचे देखील. अगदी पडद्यावर देवाचे दर्शन झाल्यावर कित्येक वृद्धांचे हात आपोआप जोडले गेलेले पाहिले आहेत मी. त्या वेळी कळायचं नाही पण आता समजतंय की त्यांच्यासाठी कदाचित ते केवळ दर्शन नव्हते तर मानसिक समाधानाची अनुभूती असावी.

त्यावेळी एवढे माहित होते की प्रत्येक पौराणिक कथेत असुरांचा संहार होतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन खोलवर विचार करण्याची कुवत नक्कीच माझ्यात नव्हती.
असुर संहाराची प्रक्रिया तेव्हाच सुरु होते जेव्हा ते असुर त्यांना मिळालेल्या वरदानाच्या शक्तीच्या जोरावर देवांना युद्धात हरवतात आणि त्या विजयाने आलेल्या अहंकारात ते स्वतःला देवांपेक्षा श्रेष्ठ समजायला लागतात आणि मग सामान्य माणसांच्या श्रद्धा, जीवनशैली आणि अस्तित्वावरच आघात करून त्यांचे जगणे असह्य करून टाकतात.

आजही अनेक मार्गांनी आपण अशाच प्रकारच्या काही व्यवस्था किंवा विचारसरणींनी वेढलेले आहोत जे त्यांच्या श्रद्धा आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात, मतभेदांना शांत करतात, आपल्या भक्तीची थट्टा करतात आणि स्थानिक संस्कृतींना दुर्लक्षित करतात. जर ते आपल्याला पटवून देऊ शकत नसतील तर ते आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अगदी कथेप्रमाणेच. त्रेता किंवा द्वापर युगात जे असुर करत होते ते आजही वेगवेगळ्या स्वरुपात चालू आहे.

महावतार नरसिम्हा या कथेत असुरांकडून देव युद्धात हरतात आणि त्यामुळे त्यांना असुरांचे दासत्व स्वीकारावे लागते. पण त्याच्याही पुढे जाऊन लोकांना यासाठी त्रास दिला जातो की त्यांनी देवांची आणि मुख्यत्वे विष्णूची पूजाअर्चा सोडून हिरण्यकश्यपाची पूजा करावी कारण तोच विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि जे त्याला जुमानत नाहीत किंवा विरोध करतात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा अथवा असह्य वेदना दिल्या जातात. त्या असह्य वेदना सहन करूनही काही बंड करतात तर बहुतांशी लोकं आता यापुढे जगणे हे असेच आहे हे मान्य करून ते जीवन मुकाट्याने स्वीकारतात.

जे आपल्या समोर आता घडतं आहे तेच भविष्यातही कायम राहणार असं नसतं कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे जे आज आहे ते उद्या असेलच असे नाही.

नेहमी प्रमाणेच नियती एक वेगळाच खेळ खेळते आणि प्रत्यक्ष राजपुत्र प्रल्हाद विष्णुभक्तीत लीन होऊन जातो. शेवटी त्या एकट्या भक्ताला वाचवण्यासाठी आणि पर्यायाने संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी विष्णू नरसिंहाचा अवतार घेतो, जो ना वरदान तोडतो ना न्याय. त्या असुराला ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानाचे उल्लंघन न करता देखील त्याला मृत्युदंड देतो आणि शेवट सुखद होतो.

हा चित्रपट पाहताना कधीही लक्षात न आलेली एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे आपल्या आयुष्यात देखील अशाच घटना राजरोसपणे घडतच असतात जिथे जो तो आपल्यावर त्यांचे विचार आणि आचार लादण्याच्या प्रयत्नात असतो. आजही, आपल्या संस्कृतीवर, श्रद्धांवर, मूल्यांवर अशाच प्रकारे हल्ले होतात. जर कोणी आपली विचारधारा पटवू शकत नसेल, तर मग आपली श्रद्धा, आपली मुळे उखडून टाकण्याचे प्रयत्न होतात.

पौराणिक कथा केवळ घडलेल्या गोष्टींबद्दल नसून त्या आरशाचे काम करतात. पूर्वीच्या आणि आताच्या समाजाचे प्रतिबिंब आणि सारखेपणा याचे ते दर्शन घडवतात. त्या सतत घडणाऱ्या गोष्टींबद्दल असतात. त्या कधीही मुलांसाठी झोपायच्या वेळेच्या कथा म्हणून बनवल्या नव्हत्या. त्या आपल्याला जागृत आणि संरेखित ठेवण्यासाठी मार्गदर्शक दिवे आहेत. जर आपण विसरलो, हार मानली, किंवा जर आपण अविश्वास दाखवला तर इतिहास कसा पुनरावृत्ती करू शकतो याची जाणीव करून देतात.
आजूबाजूला डोळसपणे पाहिले तर आपल्या जवळपास तुम्हाला या गोष्टी घडताना दिसतील. आणि जाणवेल की आजच्या युगात देखील म्हणजे या अत्याधुनिक जगात देखील पुराण काळाप्रमाणेच आपल्या संस्कृतीवर आघात होत आहेत.

पौराणिक कथा ऐकताना पूर्वी वाटायचं की फक्त कथा बदलते पण कथेचा गाभा तोच असतो पण हा चित्रपट पाहिल्यावर जाणवले की पौराणिक कथा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपल्याला सजग ठेवतात. कुणीतरी त्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेऊन पूर्ण समर्पण करायची गरज असते आणि एका व्यक्तीचा सुद्धा पूर्ण विश्वास आणि समर्पण असलं की परिवर्तन शक्य होतं आणि फक्त ५ वर्षांचा प्रल्हाद नेमके तेच करतो.

लहानपणी ऐकले होते की हिरण्यकश्यप प्रल्हादाला विचारतो की तू ज्या विष्णूची भक्ती करतो आहेस तो कुठे आहे? इथे आहे, तिथे आहे, या खांबात आहे, त्या खांबात आहे? आणि प्रत्येक वेळी प्रल्हाद त्याला होय असेच उत्तर देतो. लहानपणी मी ऐकले होते की देव कणाकणात आहे त्यावरून वाटले होते की तेच तत्वज्ञान तो वापरत आहे पण या चित्रपटात ते ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याला तोड नाही. त्यामुळे चित्रपट पहाच आणि तेही थियेटर मध्येच.

हा फक्त मुलांसाठीचा चित्रपट नाहीये. हा चित्रपट अशा सर्वांसाठी आहे ज्यांना आपल्या प्राचीन कथांच्या प्रासंगिकतेबद्दल शंका आहेत. आणि विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना आठवण करून देण्याची गरज आहे की बदल नेहमीच एका अढळ भक्तापासून सुरू होतो.

तर, जा. ते पहा. कथा उलगडू द्या. आणि कदाचित, कदाचित, तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त घेऊन परताल.

मी फक्त एक समीक्षा लिहिण्याच्या उद्देशाने बसलो होतो. पण हा चित्रपट बघून माझ्या अंतर्मनाला स्पर्श झाला आणि काही विचार खोलवर जागे झाले. याच प्रवासाची मी माझ्या ब्लॉगमध्ये सविस्तर मांडणी केली आहे.

Mahavatar Narasimha English Blog>>>

Blog by Life Coach & Business Mentor Shailesh Tandel

Life Coach | Business Mentor | Executive Coach | Corporate Trainer | Time Management Coach | Relationship Coach 

If this made you pause… the next one might move you.


Reflections on life, work, and growth.

Join a small circle of readers exploring clarity, growth, and meaningful action.

Loading
Posted in Inspirational.

10 Comments

  1. As usual your write-up is eyeopener and teach us how one can watch the movie. It’s more educational then entertainment.
    Keep it up sir. You are always our mentor,guide and Philosophers.
    Thanks sir

  2. खुप छान मुल्यांकन केलंय
    आजच्या परिस्थितीशी जुळवून!
    इतिहास रिपीट होतो पण नवीन पिढीला हे नवं वाटतं
    तुमचे आभार!

    • वेळात वेळ काढून ब्लॉग वाचला व कमेंट्स देखील केली त्याबद्दल आभार.
      नवीन पिढीने त्या गोष्टी पूर्वी अनुभवलेल्या नसतात त्यामुळे त्यांना ते नवीन वाटणे साहजिक आहे आणि म्हणून तर आपली जबाबदारी आणखी जास्त वाढते. त्यासाठी माझा हा खारीचा वाटा.

  3. सर,
    अतिशय मार्मिक आणि उत्कंठावर्धक मुल्यांकन…
    जेणेकरून समीक्षा वाचुन, एकदातरी हा चित्रपट पाहायलाच हवा…
    – हि भावना निर्माण होते.

    आपला शाश्वत इतिहास नवीन पिढीला माहित करून देण्याच्, पुण्याचं काम आपण करत आहात… मनापासून आभार.
    ?

    • चित्रपट नक्कीच पहा खूप आवडेल तुम्हाला आणि जे मी करतोय तो फक्त खारीचा वाटा आहे. वेळात वेळ काढून ब्लॉग वाचला व कमेंट्स देखील केली त्याबद्दल आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *